जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन, उपोषण, मोर्चे काढण्यात येत आहेत. विविध पक्षांकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दि.6 मार्च 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी मनाई आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, अंत्यविधी यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर या आदेशातून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.
