कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेली विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत जेणेकरून राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक अधिक उंचावेल. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूरअंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरू असलेल्या विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारती मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावे. काम पूर्ण करताना गुणवत्तेकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करू नये. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामांची संपूर्ण राज्याने दखल घ्यावी, असे आदर्शवत काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री आबिटकर यांनी शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे, प्रादेशिक मनोरुग्ण रुग्णालय, सांगाव (कागल) येथील वैद्यकीय महाविद्यालय, श्री क्षेत्र आदमापूर येथील विकास आराखडा, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय इमारत देखभाल व दुरुस्ती, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी वैद्यकीय महाविद्यालय इमारत, वसतिगृह, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सारथीची इमारत याबाबत सविस्तर आढावा घेतला.
लवकरच बाळूमामाच्या यात्रेला सुरुवात होणार असून यावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, कार्यकारी अभियंता बी. एल हजारे, सी. ए. आयरेकर, उपअभियंता महेश कांजर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, इफ्तेकार मुल्ला, बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांच्यासह जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व उपअभियंता तसेच पोलीस विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
