महाशिवरात्री

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात.
हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे” स्मरण आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो.भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती ५ व्या शतकात झाली असे मानले जाते.
काश्मीर शैव धर्मात, काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांद्वारे या सणाला हर-रात्री किंवा हेरथ किंवा हेरथ म्हणतात. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडवनृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- “मला मार पण इतराना सोडून दे.” हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.
शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हणले जाते.
महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही.

Scroll to Top