कोल्हापूर / प्रतिनिधी
गांधी मैदानातील नाल्याचे पाणी बाहेरून वळवून घेण्याचे काम सुरू केले असून त्यास ५ कोटींचा निधी मंजूर आहे. हे काम प्रगतिपथावर असताना सद्यस्थितीत सुरू असणारा मूळ नाला पोती, बाटल्या टाकून मुद्दाम तुंबविण्याचा प्रकार काही समाजकंटक करत आहेत. तत्काळ नाला स्वच्छ करून गांधी मैदानाची साफसफाई करावी व मैदान पूर्ववत खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
संपूर्ण गांधी मैदानात नाल्याचे पाणी शिरल्याची घटना घडली. याबाबत स्थानिक नागरिक व खेळांडूनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली. या पार्श्वभूमीवर आ. क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत गांधी मैदानांची पाहणी केली.
आ. क्षीरसागर म्हणाले, गेल्या काही वर्षांत गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होऊन, खेळाडूंची गैरसोय होत आहे. गांधी मैदानात पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यात आराखडा तयार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी रु.५ कोटींचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या निधीतून कामास सुरुवात झाली आहे. परंतु, कालच्या घटनेचा विपर्यास करून शासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पाणी तत्काळ निर्गत करण्यासाठी उपाययोजना राबवा. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घ्या. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई करा. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
