ओझोन थराचे रक्षण ही काळाची गरज : प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे

कोल्हापूर: ओझोन थराचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा वैज्ञानिकांची जबाबदारी नाही, तर ती प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. विशेषतः युवकांनी यामध्ये पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र व प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी केले. भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित जागतिक ओझोन दिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोलशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विनोद वीर होते. याप्रसंगी व्यासपीठावर रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगावकर, तानाजी हाके, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक  विशाल महांगडे यांची उपस्थिती होती.
 प्रा. (डॉ.) झांबरे पुढे म्हणाले, ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंनी बनलेला वायू असून, तो पृथ्वीच्या वातावरणातील स्थितांबरीय या थरात आढळतो आणि सूर्याच्या घातक अल्ट्राव्हायोलेट  किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करतो आपल्याला जर भविष्यात शुद्ध हवा आणि सुरक्षित पर्यावरण हवे असेल, तर आजपासून त्यासंबंधी कृती करावी लागेल. त्यांनी पुढे ओझोनची क्लोरोफ्लुरोकार्बनसोबत होणारी रासायनिक अभिक्रिया, कमी होत चाललेला ओझोनचा थर आणि तयार झालेले ओझोन छिद्र, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल यावर सखोल विवेचन केले.
डॉ. वाटेगावकर यांनी जागतिक ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना सांगितले की, ओझोन थराचे रक्षण, जागतिक उष्णता नियंत्रण आणि हरितगृह वायूंवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. स्थितांबरीय ओझोन आपले संरक्षण करतो, तर तपांबरीय ओझोन आरोग्यास हानीकारक असतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले. पर्यावरण सांभाळण्यासाठी आणि हरितगृह वायू कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असेही त्यानी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. (डॉ.) वीर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात न अडकता, समाजात पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवण्याचे कार्य हाती घ्यावे.ओझोन थराचे संरक्षण, पर्यावरणविषयक जागरूकता, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, आणि तरुण पिढीने घ्यायची भूमिका तसेच जागतिक ओझोन दिनाचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
पाहुण्यांची ओळख तानाजी हाके यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शेवाळे यांनी केले तर धनश्री कराळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. (डॉ.) विनोद वीर, स्वप्नील कदम, मनीषा शेवाळे, तानाजी हाके, आणि धनश्री कराळे यांचे विशेष योगदान लाभले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. डॉ. झांबरे सरांचे विचार केवळ माहितीपरच नव्हे तर विचारप्रवृत्त करणारेही ठरले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
Scroll to Top