जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या सुलभ व पारदर्शीपणे व्हाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन बदल्यांचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले; परंतु पोर्टलच ओपन होत नसल्याचा अनुभव अनेक शिक्षकांना येऊ लागला आहे. दरम्यान सुगम व दुर्गम शाळांचे पुनर्विलोकन करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीही जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांचा घोळ काही दिवस चालण्याची शक्यता आहे.
पूर्वी फेब—ुवारी महिना आला की जिल्हा परिषदेत शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू होत असत. बदली पात्र शिक्षकांची माहिती मार्चपर्यंत तयार असायची. या बदल्यांमध्ये ज्याचा वशिला मोठा तो आपल्या सोयीची बदली करून घेत होता. शिक्षकांच्या बदल्यांचा शिक्षक संघटनांच्या नेत्यांचा तर आवडीचा विषय. त्यावेळी बदलीच्या काळात शाळा सोडून त्यांचा जि. प. प्राथमिक विभागातच मुक्काम असायचा. त्यामुळे बदल्यांबाबत तक्रारी वाढू लागल्याने शसनाने जिल्हा परिषदेचे बदलीचे अधिकार काढून घेतले आणि बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पवित्र पोर्टल नावाचे अॅप तयार करण्यात आले. अॅपवर शिक्षकांनी माहिती भरल्यानंतर त्यातून बदली पात्र शिक्षकांची यादी निश्चित केली जाते. त्यासाठी रविवार (दि. 9) पर्यंत माहिती भरण्याची मुदत होती; परंतु अॅपच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षक माहिती भरू शकले नाहीत. त्यातच दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी पुनर्विलोकन करून त्यात सुधारणा करावयाची असते. यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी सन 2022 मध्ये सुधारित केल्यामुळे सन 2025 च्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेकरीता अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ही यादी 15 मार्चपर्यंत करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे ही माहिती अॅपवर अपलोड करण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
