भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात.बायका उखाणे घेतात. व एकमेकांना “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणतात.
मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे ‘संक्रांती’ म्हणजे ‘हस्तांतरण’, हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे. लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते १५ जानेवारीला येते, अन्यथा १४ जानेवारीला असते.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात.अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात. याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही.